जालना : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची तोफ आज जालन्यात धडधडली. भुजबळ यांनी आपल्या तडाखेबंद भाषणातून मनोज जरांगे पाटील यांचा समाचार घेतला. तसेच ओबीसी आरक्षण कसं दिलं गेलं, त्याचा इतिहासच सांगितलं. आम्ही कुणाचं आरक्षण खात नाही,आम्हाला जे कोर्टाने आणि मंडल आयोगाने दिलं, तेच आम्ही घेत आहे, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
याद राख, माझ्या शेपटीवर पाय द्यायचा प्रयत्न करू नकोस असं थेट आव्हान राष्ट्रवादी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांना दिलं आहे. छगन भुजबळांनी मराठा आरक्षण आंदोलनवरून मनोज जरांगे यांच्यावर चांगलीच टीका केली आहे.
जालन्यामधील अंबड या ठिकाणी आज ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी मनोज जरांगे यांना पहाटे आणून आंदोलनाला बसवल्याचा आरोपही त्यांनी केला.
छगन भुजबळ म्हणाले की, न्यायमुर्ती त्याला सर सर म्हणत होते, तो पाचवी पास तरी आहे का? माझ्या बद्दल बरच काही बोललास तुझं खातोय का रे…याद राख माझ्या शेपटी वर परत पाय द्यायचा प्रयत्न करू नकोस. हा पहिला आणि शेवटचा मेळावा नाही. प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात अता मिळावे झाले पाहिजेत. ओबीसींची संख्या जास्त असून महाराष्ट्रातही बिहारप्रमाने जातीय जनगणना.(Caste Census) ताबडतोब झाली पाहिजे, त्यामुळे ओबीसींची नेमकी संख्या किती आहे हे समोर येईल असं राज्याचे मंत्री छगन भुजबळ म्हणाले.