बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई
तथागत बुद्धांच्या क्रांतीने, परिवर्तनवादी संतांच्या संस्काराने, छत्रपती शिवाजी राजांच्या शौर्याने संभाजीराजांच्या धैर्याने, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या कार्यप्रेरणेने, फुले दांपत्याच्या असीम त्यागाने मंगलमय झालेल्या भारतीय भूमीत अनेक मौल्यवान रत्न जन्माला आली. पण विशिष्ट लोकांनाच लिहिण्याचा हक्क असल्यामुळे आमची अनेक मौल्यवान रत्न इतिहासाने बेदखल केली. आज संविधानामुळे आम्हाला लेखन स्वातंत्र्य प्राप्त झाले व आम्ही लिहायला लागलो. जाणीवपूर्वक इतिहासाने आमच्या बेदखल केलेल्या महापुरुषांना आम्ही वाचू, लिहू लागलो. असेच इतिहासाने बेदखल केलेले सामान्य कुटुंबात जन्माला आलेले पण आपल्या असामान्य कार्यकर्तृत्वाने ज्यांनी भारतीय इतिहासाला तेजोमय केले असे कृषक क्रांतीचे प्रणेते, आधुनिक भारतीय शिक्षण व्यवस्थेचे उद्गाते, स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख. विदर्भा नदीच्या कुशीत वसलेल्या अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी शुक्रवारी 27 डिसेंबर 1898 ला राधाबाई व शामराव देशमुख(कदम) यांच्या पोटी पंजाबराव देशमुखांचा जन्म झाला. प्राथमिक, माध्यमिक, पदवीपर्यंतचे शिक्षण प्रतिकूल परिस्थितीत पूर्ण करून 7 सप्टेंबर 1920 ला उच्च शिक्षणासाठी रॉयल सोसायटी ऑफ लंडन येथे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख दाखल झाले. 15 जुलै 1926 ला भारतात परतल्यानंतर भाऊसाहेबांनी ब्राह्मणेतर चळवळीमध्ये स्वतःला झोकून दिले. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचा वारसा त्यांना वडिलोपार्जितच होता. त्यांचे वडील शामराव देशमुख हे सत्यशोधक होते. महात्मा फुलेंनी सांगितल्याप्रमाणे गोरगरीब ,बहुजन, दलित उपेक्षित समाजाच्या उत्थानाचा मंत्र म्हणजेच शिक्षण. महात्मा फुलेंच्या शैक्षणिक क्रांतीला पूर्ण करण्यासाठी भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी 1926 ला अमरावती येथे श्रद्धानंद वसतिगृहाची स्थापना केली. कर्मवीर भाऊरावांप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या जातीचा स्पर्श न होऊ देता भाऊसाहेबांनी जीव लावला. या श्रद्धानंद वसतिगृहाला गाडगेबाबांनी सुद्धा सर्वतोपरी मदत केली. गाडगे बाबांच्या झाडूने व भाऊसाहेबांच्या खडुने या वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे जीवन प्रकाशमय केले. हे श्रद्धानंद वसतीगृह म्हणजे भाऊसाहेबांच्या शैक्षणिक क्रांतीची नांदी ठरले. कमवा व शिका या योजनेप्रमाणे विद्यार्थी हितासाठी 1926 ला त्यांनी मुष्टी फंडाची स्थापना केली. 1927 ला त्यांनी शेतकरी संघाची स्थापना करून शेतकऱ्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र केसरी हे वर्तमानपत्र सुरू केले. महाराष्ट्र केसरीच्या शिरोभागी बहुजन हिताय बहुजन सुखाय हा भगवान बुद्धाचा संदेश छापलेला असायचा या घोषवाक्यखाली छत्रपती शिवरायांचे चित्र आणि त्या चित्राखाली समता, स्वातंत्र्य व बंधुप्रेम छापलेले असायचे. मुखपृष्ठावर दृष्टीसमोर समता ठेवी ,स्वातंत्र्य धरी शीरी, बंधुप्रेमा मागे लावी महाराष्ट्र केसरी असे लिहिलेले असायचे. आपल्या वैयक्तिक व सार्वजनिक जीवनात अस्पृश्यतेला कोणताही थारा न देता बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या उक्तीप्रमाणे 26/11/1927ला त्यांनी सोनार समाजातील विमल वैद्य या उच्च विद्या विभूषित तरुणीसोबत आंतरजातीय विवाह केला. या आंतरजातीय विवाहने भाऊसाहेबांचे संपूर्ण कुटुंब व संपूर्ण जीवन होरपळून निघाले. पण भाऊसाहेब तसूभरही डगमगले नाहीत.18 ऑगस्ट 1928 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मदतीने अस्पृश्यासाठी अमरावती येथे अंबादेवी यशस्वी मंदिर सत्याग्रह केला. याच सुमारास डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांची वाढत असलेली लोकप्रियता प्रतिस्पर्ध्यांच्या नजरेत खूपत असल्यामुळे भाऊसाहेबांच्या खूणाची सुपारी अमरावतीच्या यासिन ड्रायव्हरला दिली पण या अपघातातून भाऊसाहेब बालंबाल वाचले .पुढे हे प्रकरण जेव्हा कोर्टात गेले तेव्हा कोर्टाच्या कचाट्यातून भाऊसाहेबांनी ड्रायव्हरला वाचवले तेव्हा भाऊसाहेब म्हणाले होते ही खून करण्यामागची बुद्धी यासिनची नसून खरे आरोपी वेगळेच आहेत. व यासीन ड्रायव्हरला निर्दोष मुक्त करण्यात आले. 1930 ला प्रांतिक कायदेमंडळावर त्यांची निवड झाली व एकाच वेळी शिक्षण सहकार व कृषी खात्याची जबाबदारी भाऊसाहेबांवर सोपविण्यात आली या तीनही खात्यांना आपल्या अलौकिक बुद्धीच्या सामर्थ्याने त्यांनी न्याय दिला या प्रांतिक कायदेमंडळाच्या समोर 1932 ला त्यांनी हिंदू देवस्थान संपत्ती बिल मांडले. या बिलात एवढी प्रचंड शक्ती होती की आज कोणत्याही शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आली नसती .आज रोजी पद्मनाभ स्वामी मंदिर, तिरुपती मंदिर, साईबाबा मंदिर, वैष्णव देवी मंदिर, सिद्धिविनायक मंदिर याशिवाय अशा अनेक मंदिरामध्ये खरबोने पैसा आहे. हा पैसा देशहितासाठी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी खर्च करावा अशी रास्त अपेक्षा या बिलातून भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी व्यक्त केली होती. महात्मा फुले व छत्रपती शाहू राजे यांच्या शैक्षणिक चळवळीला नवा आयाम देण्यासाठी 1931 ला त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. देशाला महत्त्वाचे क्रीम देण्याचे काम या संस्थेने केले. आज स्वतंत्र भारताच्या विकासात भाऊसाहेबांच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अविरतपणे देश सेवा करण्याचे काम मरणोपरांत भाऊसाहेब करत आहेत. 1933 ला त्यांनी कर्जलवाद बिल मांडले कर्जलवाद विधेयकाचे स्वरूप अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण होते. हा शेतकरी वर्गाच्या कर्जमुक्तीचा महत्त्वाचा कायदा होता शेती आणि माती व शेतकरी भाऊ साहेबांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. पुराणातील काल्पनिक कामधेनूपेक्षा ते बकरी, गाय, म्हैस यावरच जास्त प्रेम करत ते बकरीला गरीबाची कामधेनु मानत असत आणि कोंबडीला ते कल्पतरू समजत. माती, मान्सून, माणुसकी ही भारतीय शेतकऱ्याची खरी धनदौलत आहे. Agriculture is the origin of a cultures. असे ते म्हणत. 1950 ला त्यांनी पुणे येथे लोक विद्यापीठाची स्थापना केली. पुढे याचे रूपांतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात करण्यात आले. एवढी दूरदृष्टी भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांकडे होती. घटना समितीचे सभासद म्हणून त्यांनी गौरवपूर्ण कार्य केले आहे. असे उद्गार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काढले आहेत. 1952 ते 1962 ते स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री होते. शिक्षण, शेती, सहकार या भोवतीच भाऊसाहेबांचे संपूर्ण जीवन गुंफलेले होते. 1955 ला त्यांनी भारत कृषक समाजाची स्थापना करून शेतकऱ्यांना भांडवलशाहीच्या विरोधात संघटित केले ते आज असते तर शेतकऱ्यांना मोर्चे किंवा आंदोलन करण्याची गरज पडली नसती. 1956 ला त्यांनी अखिल भारतीय दलित संघाची स्थापना केली या अखिल भारतीय दलित संघाच्या अंतर्गत भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा, सेवाभाव धरा हा महत्त्वाचा नारा त्यांनी दिला. आपल्या भाषणाची सुरुवात याच घोषवाक्याने ते करत असत. 1960 ला त्यांनी जागतिक कृषी प्रदर्शन आयोजित करून भारतीय शेती ही जागतिक स्तरावर पोहोचवली. तथागत भगवान बुद्ध, संत तुकाराम, संत गाडगेबाबा, मासाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू राजे, महात्मा फुले अशा अनेक परिवर्तनवादी क्रांतिकारी महापुरुषांचा त्यांच्यावर प्रभाव होता, म्हणूनच प्राथमिक शिक्षणापासून ते जागतिक कृषी प्रदर्शनापर्यंत सर्वच विषय डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी कोळून पीले होते. म्हणून त्यांना शिक्षण महर्षी, जागतिक कृषक क्रांतीचे विधाते, विदर्भातील पहिले सहकार नेते व स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री म्हणून ओळखतात. 10 एप्रिल 1965 ला डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांचा दिल्ली येथे मृत्यू झाला. जसा एक स्वयंप्रकाशित सूर्य कायमचा अस्ताला गेला. आज स्मृतिदिनाच्या निमित्ताने भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना विनम्र अभिवादन.